नाशिक (MBP LIVE 24) :
तुम्ही हेल्मेट घातले असले तरीही तुम्हाला शिक्षा आणि दंड अशा कारवाईला सामोरे जावे लागू शकते. नव्या नियमानुसार दुचाकी चालवताना 'आयएसआय' मार्क असणारे हेल्मेट न वापरणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. याबरोबरच दंडही ठोठावला जाऊ शकतो. मंत्रालयाने १ जूनपासून या नवीन नियमावलीस लागू केले आहे. नेमकी काय आहे ही नियमावली...
रस्त्यावर दुचाकी चालवताना उत्तम दर्जाचे हेल्मेट घातल्यास नेहमीच अपघातामुळे होणाऱ्या नुकसानीपासून आपला बचाव करते. त्यामुळे कित्येक दुचाकीस्वारांचा जीव वाचल्याची उदाहरणे आहेत. पण अनेकदा थोडे पैसे वाचवण्याच्या नादात लोक रस्त्यावर कुठेही स्वस्तात हेल्मेट खरेदी करतात. पण आता असे होणार नाही, कारण रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 'आयएसआय' मार्क नसलेल्या हेल्मेटच्या उत्पादन, आयात, विक्री आणि साठवणुकीला बंदी घातली आहे.
केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, जर कोणी आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट विकत असेल किंवा खरेदी करत असेल तर दोघांवरही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. यामुळे आता दुचाकी चालकांना आयएसआय मार्क असणारे हेल्मेट घालणेअनिवार्य आहे. हे हेल्मेट BIS (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) गुणवत्ता मार्गदर्शकानुसार असणे गरजेचे आहे.
दोन वर्षांपूर्वी १ नोव्हेंबर २०१८ मध्येही असाच निर्णय जारी केला होता. दरम्यान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून २६ नोव्हेंबर २०२० रोजी यासंबंधी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये स्पष्टपणे सर्व दुचाकींसाठी वापरण्यात येणारे हेम्लेट बीआयएस गुणवत्ता मार्गदर्शकांनुसार असले पाहिजेत तसेच १ जूनपासून त्यांच्यावर आयएसआय मार्क असला पाहिजे असे सांगण्यात आले आहे.
पाच लाखांपर्यंत दंड भरावा लागेल : या नव्या नियमांच्या सहाय्याने दुचाकीस्वारांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा तसंच ती अजून चांगली करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान कायद्याचं आणि नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. जर एखादी व्यक्ती आयएसआय मार्क नसणाऱ्या हेल्मेटचं उत्पादन, विक्री, साठवणूक किंवा आयात करत असेल तर त्याला एक वर्षांपर्यंतची जेल किंवा एक ते पाच लाखांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.