इतिहासात काही क्षण असे असतात, जे काळाच्या ओघात अजरामर ठरतात. महाराष्ट्राच्या इतिहासातील असाच एक सुवर्णक्षण म्हणजे 'छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा'.
अठरापगड मराठा जातींच्या बलिदानातून आणि स्वराज्य स्थापनेच्या अथक प्रयत्नांतून साकारलेले हे स्वप्न रायगडाच्या साक्षीने साकार झाले, 'एक स्वतंत्र हिंदवी तक्त' प्रस्थापित झाला.
सन १६७४ चा ६ जून, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शनिवार. पहाटेच्या वेल्हाळ सौरभात, रायगड किल्ल्यावर हजारो स्वराज्यप्रेमींसमोर छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झाले. आकाश दणाणून गेले.
"छत्रपती शिवाजी महाराज की जय!" या गर्जनेने. किल्ल्यांवरून, जलदुर्गांवरून आणि आरमारी गलबतांवरून तोफांचे दनकाले झाले. संपूर्ण सह्याद्रीच्या कुशीत एक अभूतपूर्व जल्लोष निनादला.
या दिव्य क्षणाचे साक्षीदार ठरले मराठी बखरकार 'कृष्णाजी अनंत सभासद', जे म्हणतात – "या युगी सर्व पृथ्वीवर म्लेच्छ बादशहा, मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला – ही गोष्ट काही सामान्य नाही." खरोखरीच, हा सोहळा सामान्य नव्हता, तो असामान्य, अद्वितीय आणि युगप्रेरक होता.
या महान सोहळ्यासाठी 'काशीतील सुप्रसिद्ध धर्मपंडित गागाभट्ट' यांना राज्याभिषेकाच्या पौराहित्यासाठी आमंत्रित करण्यात आले. गागाभट्ट मूळ पैठणचे, पण काशीमध्ये स्थायिक झालेले. त्यांच्या तोडीचा विद्वान त्या काळात हिंदुस्थानात दुसरा कोणी नव्हता.
राज्याभिषेकपूर्व विधींची सुरुवात २९ मे १६७४ रोजी शिवरायांच्या सुवर्णतुला व मौजीबंधन समारंभाने झाली. ३० मे रोजी वैदिक पद्धतीने विवाह लावण्यात आला आणि ६ जून रोजी, पहाटे पाच वाजता शिवाजी महाराजांनी छत्रपती म्हणून सिंहासनाची गाठ घेतली.
या सोहळ्यास 'राजमाता जिजाऊ', महाराणी 'सोयराबाई', राजपुत्र 'संभाजीराजे', आणि हजारो मावळे उपस्थित होते. सोहळ्याच्या दिवशी सोन्याच्या ३२ मणांच्या सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज हे दृश्य इतिहासाच्या पटलावर कोरले गेले.
या सोहळ्यासाठी अपार खर्च करण्यात आला. इतिहासकार सांगतात, '१ कोटी ४२ लाख होण' एवढा खर्च झाला. गागाभट्टांना '७ हजार होण दक्षिणा', ब्राह्मण भोजन, विधी, हवन, होम आणि विविध धार्मिक समारंभ बारा दिवस चालले. दानधर्म ७ जूनपासून पुढे सलग बारा दिवस झाला.
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी 'नवीन शक' सुरू केला, 'अष्टप्रधान मंडळ' स्थापन केले, 'राज्यव्यवहार कोश' तयार करवून घेतला आणि 'चलनी नाणी' – 'शिवराई (तांब्याची)' व 'सोन्याचा होण' प्रचलनात आणली.
हे सर्व घडवून आणताना महाराजांनी केवळ एक राजा म्हणून नव्हे, तर दूरदृष्टी असलेल्या एक कुशल प्रशासक आणि राष्ट्रनायक म्हणून इतिहासात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
या दिव्य सोहळ्याचे साक्षीदार ठरलेले इंग्रज वकील 'थॉमस निकल्स' देखील या देखाव्याने थक्क झाले. इंग्रज, फ्रेंच, डच आणि पोर्तुगीजांसारख्या परकीय शक्तींना मराठी तक्ताची ताकद जाणवू लागली.
'रायगड' हा त्यानंतर केवळ राजधानी राहिला नाही – तो "शिवतीर्थ" म्हणून ओळखला जाऊ लागला. या सोहळ्याने दिल्लीपासून विजयनगर, वारंगल, देवगिरी, द्वारसमुद्र आणि कर्णावतीपर्यंत पराभूत झालेल्या हिंदू सिंहासनांना नवसंजीवनी दिली.
शिवराज्याभिषेकाचा हा सोहळा म्हणजे केवळ एका राजाचे राज्यारोहण नव्हे, तर 'हजारो वर्षांच्या गुलामगिरीवर मात करून उभे राहिलेल्या स्वाभिमानाचा जयघोष' होता. हा सोहळा 'इतिहासाचा एक अपूर्व क्षण' होता. जो युगानुयुग प्रेरणा देत राहील.
'जय भवानी, जय शिवाजी!
- प्रा. साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण
(लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत)