अहमदनगर - विरभद्र मंदिरामधील मूर्तीचे दागिने चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यास स्थानीक गुन्हे शाखेस यश आले. 15 सप्टेंबर रोजी पहाटे राहाता येथील विरभद्र मंदिरात घुसून विरभद्र महाराज, शंकर व पार्वती या देवतेचे मुकूट, पादुका व इतर चांदीचे दागीने असा चार लाखांचा ऐवज चोरून नेला होता. देवस्थानच्यावतीने गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व स्थानिक पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी तत्काळ घटनास्थळास भेट देऊन गुन्हा शाखेचे एक पथक नेमून कोणत्याही परिस्थितीत आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.
आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा भास्कर पथवे, रा. नांदुरी दुमाला, ता.संगमनेर याने केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, मनोज गोसावी, संदीप पवार, शंकर चौधरी, खोकले, दीपक शिंदे, योगेश सातपुते, सागर सुलाने, राहुल साळुंके, देविदास काळे आदी पथकाने नांदुरी दुमाला येथे जाऊन आरोपीच्या ठाव ठिकाण्याची माहिती घेतली.
आरोपी हा पेमगिरीच्या डोंगरात लपून बसल्याची माहिती मिळाली.आरोपीला पकडण्यासाठी पथकाने रात्रभर पावसात जंगलात सापळा लावून भास्कर पथवे (वय 42) याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबुल करत त्याने मुद्देमाल नांदुरी दुमाला येथील शेतात लपवून ठेवल्याचे सांगितले. तसेच चोरलेले दागिने त्याने काढून दिले. आरोपीस अटक करून राहाता पोलिसांच्या ताब्यात दिले.