जयंत येलुलकर यांना साहित्य परिषदेचा ‘हा’ राज्यस्तरीय पुरस्कार


अहिल्यानगर – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा रत्नाकर कुलकर्णी स्मृती राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट कार्यकर्ता’ हा मानाचा पुरस्कार यंदा अहिल्यानगरचे साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व जयंत येलुलकर यांना जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पुरस्कारांची घोषणा पुणे येथे केली. या पुरस्काराचे वितरण म.सा.प.च्या १२० व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, २७ मे रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील माधवराव पटवर्धन सभागृहात म.सा.प.चे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार आहे.

स्मृतिचिन्ह व रोख रकमेचे स्वरूप असलेल्या या पुरस्काराद्वारे येलुलकर यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेण्यात आली आहे. जयंत येलुलकर हे म.सा.प. सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह असून अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध साहित्यिक व सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी स्वाक्षरी मोहिमा, निवेदने, चौकसभा आदी माध्यमांतून येलुलकर यांनी व्यापक जनजागृती केली. ‘वारसा’ हा दिवाळी अंक गेली दहा वर्षे त्यांच्या पुढाकारातून प्रकाशित होत असून त्याला राज्यस्तरीय गौरव प्राप्त झाला आहे.

त्याचबरोबर विभागीय साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन, स्थानिक कवींना व्यासपीठ मिळवून देणारे उपक्रम ही त्यांची विशेष कामगिरी ठरली आहे. त्यांना यापूर्वीही सामाजिक क्षेत्रातील चांगल्या योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे.

या यशाबद्दल येलुलकर यांचे अनेक मान्यवरांनी, ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतराव गडाख, आमदार संग्राम जगताप, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कवी चंद्रकांत पालवे, अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आदींनी अभिनंदन केले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !