अहिल्यानगर – बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे रक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन करणे काळाची गरज झाली आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार आहे.
हीच सामाजिक जबाबदारी ओळखत ‘आरोग्यम बहुउद्देशीय फाऊंडेशन’ आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने गोरक्षनाथ गडाच्या पायथ्याशी असलेल्या मांजरसुबा वन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमात अनेक युवक आणि पर्यावरणप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. फाउंडेशनचे अध्यक्ष कोमल घोडके, चंचल कर्पे, अक्षय मोकाटे, राहुल कर्पे, मुकुंद घोडके, विजय कवडे, गणेश नारायणे यांच्यासह वनरक्षक राजश्री राऊत मॅडम व मदतनीस शिंदे उपस्थित होते.
सामाजिक जाणिवेतून रविवारी, दिनांक १५ जून २०२५ रोजी साकार झालेल्या या उपक्रमात वड, पिंपळ, करंज, जांभूळ, आवळा यासारख्या देशी प्रजातींच्या एकुण ५० झाडांची लागवड करण्यात आली.
वृक्षलागवड हा एक दिवसाचा उत्सव नसून त्याचे रक्षण आणि संवर्धन ही अखंड प्रक्रिया आहे, हे जाणून ‘आरोग्यम’ फाऊंडेशनने वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी देखील स्वीकारली आहे.
यापुढे दर महिन्याला एक दिवस नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षारोपण केले जाणार आहे. आणि लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष कोमल घोडके यांनी स्पष्ट केले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होऊन युवकांमध्ये पर्यावरण रक्षणाची चेतना जागृत होत असल्याचे वनरक्षक राजश्री राऊत यांनी सांगितले.
गोरक्षनाथ गडाच्या परिसरात हरित पट्टा निर्माण करून भावी पिढीसाठी शुद्ध पर्यावरण देण्याचा ‘आरोग्यम’चा संकल्प निश्चितच प्रेरणादायी आहे. याद्वारे परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरणाप्रती जनजागृती निर्माण होईल, असा विश्वास आहे.