पुणे – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना लोखंडी पूल रविवार, दि. १५ जून २०२५ दुपारी ३:३० वाजता अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.
या पुलावर वर्षाविहारासाठी आलेल्या सुमारे १०० पर्यटकांपैकी ५० जणांचा सुखरूप बचाव करण्यात आला असून, त्यापैकी १८ जण जखमी आहेत. उपचारा दरम्यान ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ३ जण अजूनही बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.
जखमींना तातडीने सोमाटणे फाटा परिसरातील पवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल व अथर्व हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) दोन पथके, ‘आपदा मित्र’, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि PMRDA अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.
स्थानिक मदत आणि बचाव संस्थाही शोधकार्यास मदत करत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूल कोसळण्याची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
मात्र, काही तज्ज्ञांनी या पुलाची झिज आणि देखभाल नसल्याकडे लक्ष वेधले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे यापूर्वीही पूल धोकादायक स्थितीत असल्याची तक्रार दिली होती, अशी माहितीही समोर येत आहे.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, बेपत्ता व्यक्तींचा शोध लागेपर्यंत प्रशासन आणि मदत पथक सतर्क आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.