छोट्याशा गावातून उगम पावलेली एक प्रेरणादायी चळवळ आज लाखो डोळ्यांत नवदृष्टीचा प्रकाश भरतेय. नगर तालुक्यातील नागरदेवळे या गावात जन्मलेले 'जालिंदर बोरुडे'.
जलसंपदा विभागात नोकरी करूनही समाजसेवेचा ध्यास न सोडणारे हे नाव आज महाराष्ट्रभर ‘नेत्रदान’ या चळवळीचे अध्वर्यू म्हणून ओळखले जाते.
१९९१ मध्ये आईच्या अंधत्वाने अंतर्मुख झालेल्या बोरुडे यांनी “नेत्रदान हीच खरी सेवा” या विचाराने 'फिनिक्स सोशल फाऊंडेशन'ची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून आजवर ११६० अंध व्यक्तींना मृत्यूनंतर मिळालेल्या नेत्रांच्या सहाय्याने नवदृष्टी प्राप्त झाली आहे.
हा केवळ एक उपक्रम नव्हे, तर 'अंधारातून प्रकाशाकडे' घेऊन जाणारी एक सामाजिक चळवळ ठरली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, हमाल, विडी कामगार, महिला, वृद्ध.. अशा हजारो गरजूंना नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियांसारखी सेवा मोफत दिली जात आहे.
या चळवळीने आजवर ३ लाख ७६ हजारांहून अधिक रुग्णांना नवजीवन दिलं आहे. दरमहा आयोजित होणाऱ्या शिबिरांतून अनेकांच्या डोळ्यांतील धुंदी जाऊन प्रकाश फुलतोय.
जालिंदर बोरुडे यांनी जनजागृतीसाठी लिहिलेली तीन पुस्तके 'दृष्टीमित्र', 'नेत्रज्योत' आणि 'अंधारातून प्रकाशाकडे' या प्रत्येक पानातून समाजाला डोळस बनवण्याची प्रेरणा मिळते. अण्णा हजारे आणि भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन झाले.
या पुस्तकांच्या प्रभावातून हजारो नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. घरातील टीका, आर्थिक तडजोडी, आणि व्यावहारिक अडथळ्यांवर "समाधान मिळतं ना, मग बस.!" असे हसून उत्तर देणारे बोरुडे आजही सेवेत रमलेले आहेत.
आता फिनिक्सचा पुढचा टप्पा म्हणजे 'फिनिक्स नेत्रालय' - नगरच्या तपोवन रोडवर त्यांच्या स्वतःच्या जागेत 'दृष्टीहीनांसाठी एक आधुनिक आणि मोफत नेत्ररुग्णालय' उभं राहणार आहे. आराखडा तयार आहे आणि लोकवर्गणीतून उभारणीचा निर्धारही.
या नेत्रालयातून गरजूंवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. हे केवळ वैद्यकीय नव्हे, तर एक सामाजिक परिवर्तन आहे. या दिव्य चळवळीत आपलीही भागीदारी असावी, हेच आजचं खरे कर्तव्य.! फिनिक्सची जबाबदारी, प्रत्येकाला नवदृष्टी देण्याची.!