येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - 'तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात, ही तुमची चूक नाही. पण गरीब म्हणूनच आयुष्य जगणं ही मोठी चूक ठरेल. योग्य शिक्षण, प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळेच यशाच्या शिखरावर पोहोचता येते'.
असे प्रेरणादायी विचार रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व अहमदनगर कॉलेजचे माजी प्राचार्य अर्जुनराव पोकळे यांनी व्यक्त केले.
श्रीमती अॅबट मायादेवी गुरुदत्त हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच विश्वशंकर प्राथमिक विद्यालय, भिंगार येथे आयोजित नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. यावेळी ज्ञानदेव पांडुळे, विजय बेरड, रमेश वराडे, शशिकला शेंडे, उषा पांढरे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्राचार्य प्रमोद तोरणे, मुख्याध्यापक नारायण अनभुळे यांची उपस्थिती होती.
विद्यालय संपूर्ण रंगीबेरंगी फुग्यांनी आणि रांगोळ्यांनी सजवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प, भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात काढलेली प्रभातफेरी परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण करणारी ठरली.
प्रास्ताविकात प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी येत्या वर्षात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात ज्ञानदेव पांडुळे यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माधव रेवगडे आणि शिक्षिका क्रांती घायतडक यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक नारायण अनभुळे यांनी मानले. समारोपानंतर विद्यार्थ्यांना स्वादिष्ट गोड जेवण देण्यात आले.