अहिल्यानगर - नशामुक्त भारत घडविण्याच्या उद्देशाने भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले असून, अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर तस्करी, विक्री व वितरणाविरुद्ध लढण्यासाठी 'मानस' ‘MANAS’ (Mental Awareness National Addiction Services) हेल्पलाईन क्रमांक 1933 सुरू करण्यात आला आहे.
छायाचित्र सौजन्य : निडपिक्स |
ही हेल्पलाईन 11 जानेवारी 2025 पासून 24 तास, आठवड्याचे सातही दिवस कार्यान्वित आहे. केंद्रीय गृहमंत्री यांच्या निर्देशानुसार, Narcotics Control Bureau (NCB), दिल्लीच्या पुढाकाराने देशभरात ‘MANAS’ हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.
सन 2047 पर्यंत नशामुक्त भारत साकारण्यासाठी हा एक निर्णायक टप्पा मानला जात आहे. या माध्यमातून नागरिकांना गोपनीयतेने अंमली पदार्थांच्या व्यवहारांची माहिती पोलीस यंत्रणेला देण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जर कोणी व्यक्ती अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी, विक्री किंवा वितरण करत असल्याचे निदर्शनास आले, तर त्यांनी त्वरित MANAS हेल्पलाईन 1933 वर संपर्क साधावा.
दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल व संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. ही हेल्पलाईन केवळ तक्रारी नोंदवण्यासाठी नसून, व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन व मानसिक आरोग्य सेवा देखील पुरवते. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन या मोहिमेत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलीसांनी केले आहे.