शेवगाव (अहिल्यानगर) - एकल महिलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न व त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न महत्वाचा असून तो दुर्लक्षित राहिला आहे. हा गंभीर प्रश्न आहे.
समुपदेशकांच्या मदतीने हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न साऊ एकल महिला समिती करणार आहे, असे प्रतिपादन हेरंब कुलकर्णी यांनी केले.
राज्यभरातील एकल महिलांच्या समस्यांवर उपाय शोधत त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या 'साऊ एकल महिला समिती'च्या शेवगाव शाखेने आज शेवगाव येथे आयोजित एकल महिला मेळाव्यात त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना त्यांनी एकल महिलांना आवश्यक ती कागदपत्रे मिळवून देणे, आधारकार्ड, कुपन, बँक पास बुक या संदर्भात मार्गदर्शन करणे, बालसंगोपन योजना, लाडकी बहीण, संजय गांधी निराधार योजना, वारस नोंदी, मालमत्ता हक्क, पोटगी याविषयावर समिती करत असलेल्या मदतीची माहिती दिली.
एकल महिलांना भेडसावनर्या विविध आर्थिक, आरोग्य विषयक व मानसिक समस्यांवर यापुढे शेवगाव तालुक्यात काम केले जाणार असून लवकरच या महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी तालुक्यातील 55 एकल महिला उपस्थित होत्या. या मेळाव्याचे आयोजन तारामती दिवटे, कारभारी गरड, प्रथमेश सोनवणे, जावेद शेख यांनी केले.