घोडेगाव परिसरात तब्बल 30 तास वीज गायब; ग्रामस्थ त्रस्त, व्यवसाय ठप्प


अहिल्यानगर - नेवासे तालुक्यातील घोडेगाव परिसरातील नागरिक तब्बल 30 तासांपेक्षा अधिक काळ अंधारात आहेत. बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे परिसरातील वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला.


गुरुवारच्या दिवसभरातही वीज न आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वीज खंडित होऊन इतका कालावधी उलटून गेला तरीही महावितरणकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

नागरिकांनी वीज वितरण कार्यालयात अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. परिणामी, अनेकांचा दैनंदिन व्यवहार, व्यवसाय व घरगुती कामकाज ठप्प झाले आहे.

इन्व्हर्टरही बंद पडल्याने रात्रीचा काळ अंधारातच गेला. घरोघरी पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे, कारण विद्युत मोटार बंद झाल्याने पाणीपुरवठा थांबलेला आहे. लहान मुलं, वृद्ध नागरिक यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शाळा, क्लासेस, वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी यांचेही काम ठप्प झाले आहे. ग्रामस्थांनी महावितरण विभागाने तत्काळ लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे.

वारंवार अशा प्रकारचा अनुभव येत असल्याने नागरिकांत संतापाची भावना निर्माण झाली असून, वीज सेवा सुधारण्यात महावितरण अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !