आपण हल्ली सारखे म्हणत असतो. लहान मुलं वाचत नाहीत. आपण त्यांनी वाचावं म्हणून फार जाणीवपूर्वक प्रयत्नही करत नाही.
माझ्याकडे पेटींगच्या क्लासला येणाऱ्या एका मुलाची आई मला म्हणाली, "देवांशने हॕरी पाॕटरचे सारे भाग वाचून काढलेत." मी म्हटलं, "छान. पण त्याला आपल्या मराठीतील शामची आई, शिवाजी महाराजांची, इतर बालवाडमय़ वाचायला द्या न..!"
"अहो जिजी, आऊटडेटेड झाली ती पुस्तकं, माझ्या आईने मला भेट दिलंय पण मी उघडलयही नाही..!" ती ललना मला हसत म्हणाली. मी गप्प झाले.
मला चौथीत असताना बाबांनी पहिल्यांदा 'शामची आई' माझ्या वाढदिवसाला दिलं. या पुस्तकाने माझ्या बालमनावर खूप खोलवर परिणाम केला. गुरुजींनी आपल्या करुणामयी लेखणीतून आपल्या आईला अजरामर करुन ठेवलं.
त्या तुरुंगवासातील वास्तव्यात 9 फेब्रुवारी 1933 रात्री कैद्यांना रात्री आईच्या गोष्टी सांगतानाच गुरुजी त्या लिहून काढत. अवघ्या पाच दिवसात म्हणजे 13 फेब्रुवारीपर्यंत हे पुस्तक लिहिले.
वडिलांच्या पडत्या काळात घर चांगले चालावे म्हणून आजची आईही धडपड करताना आपण पहातोच. याचे परिणाम मुलांच्या बालमनावर होत रहातात.
हे 42 रात्रीचे फक्त लेखन नाही. ती एका आईविषयी प्रचंड प्रेम असलेल्या मुलाची स्पंदने आहेत.
शामची आहे कोण आहे ? ती आपल्या कुंटुंबियांवर प्रेम करताना आपल्या मुलांना मुल्यसंस्कार देते. छोट्या छौट्या प्रसंगातून ती शामला पर्यावरण, जातीयताविरोध गरिबांविषयी कणव शिकवते.
कश्वीला मी 'मुकी फुले' सांगताना.. तिने आवडीने सारी कथा ऐकली. शेवटी माझ्याबरोबर कश्वीच्या डोळ्यातही पाणी होतं. आई एका प्रसंगात शामला सांगते 'मोह टाळणं म्हणजे धर्म..! 'यासारखी सुरेख आणि सोप्पी धर्माची व्याख्या कुणी सांगितली असेल?
आजच्या मुलींनी 'शामची आई' वाचणं मला फार महत्त्वाचे आणि अतिआवश्यक वाटते. कारण, शामची आई मुलांशी सतत बोलत असते. न चिडता शामला समजून घेतेय. छोट्या छोट्या प्रसंगातून त्याला मूल्याची ओळख करुन देतेय.
केवळ शब्दाने नाहीतर आपल्या कष्टप्रद जीवनातून मायेनं शामला घडविते. 'मुलांशी कसं वागावं ? कसं बोलावं ? हे शिकण्यासाठी तरी आजच्या मातांनी हे पुस्तक वाचायला हवं...!
आणि मग मुलींनो तुम्हांला तुमचं पालक असणं आरश्यासारखं लख्खं खरेपण दाखवेल. एक जादूच्या झाडूची गोष्ट वाचणं ही प्रतिष्ठा नाहीच..!
सानेगुरुजींची आज जयंती. राष्ट्र सेवादलाचे आधारस्तंभ असलेले गुरुजी माझ आदराचे स्थान आहेत. माझे बाबा वयाच्या दहाव्या वर्षी सानेगुरुजींना भेटले अन अनुयायी झाले. मी राष्ट्रसेवादलात गेले ते बाबांच्यामुळे...!
आणि जगण्यात ती संस्कारमुल्य जगताना दिशादर्शक ठरुन जातात. पंढरपूरचे उपोषणाचे सांगताना बाबा म्हणाले होते, एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाचे दर्शन दिन दलितांना मिळावं म्हणून दिलेला लढा होता.
खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित
जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे
जगाला प्रेम अर्पावे
बस्स एवढंच...
तरी गुरुजी, हा एवढा द्वेष आहे हो या जगात...??
- स्वप्नजादेवी घाटगे (कोल्हापूर)
(आज गुरुजींची पुण्यतिथी.. तुमच्या संस्काराना विनम्र वंदन)