गेलेली वेळ परत येत नाही. हे वाक्य आपण लहानपणापासून हजारो वेळा ऐकलेले असते. पण आपण आचरणात किती आणतो? हा विचार करण्याचा विषय आहे.
मी वक्तशीर आहे, याचा मला कित्येक वेळा त्रास होतो. वक्तशीरपणा हा यांच्या रक्तात मुरलेला होता. एकदा ग्यानी झैलसिंग हे राष्ट्रपती असताना त्यांनी यांच्याकडे जेवण्याची इच्छा प्रदर्शित केली.
यांच्या घरी जेवायला येण्याची वेळ ठरली. संध्याकाळी सात वाजता. पण रात्री आठपर्यंत त्यांचा पत्ता नव्हता. आणि त्याच वेळी फोन आला की ते थोड्या वेळात निघत आहेत. पण यांच्या सौभाग्यवतीने जेवण वाढायला सुरवातही केली.
थोड्यावेळाने पुनः फोन आला की ते गाडीत बसले आहेत, निघताहेत. यांनी उत्तर दिले, 'जेवण संपले आहे आणि आचारीही घरी गेला आहे'. यांच्यासारखा माणूसच असे धाडस करु शकतो. ही व्यक्ती म्हणजे खुशवंत सिंह.
वेळ न पाळणे आजकाल प्रतिष्ठेचे झाले आहे बहुतेक.! यामध्ये आमच्या सारख्या वक्तशीर माणसांची मोठी पंचाईत होते. एखादा कार्यक्रम जाहीर होतो, निमंत्रण पत्रिका काढली जाते. हल्ली वॉट्सअपवर लगेच पत्रिका पाठविण्यात येते.
हां मंडळी त्यात वेळ घातलेली असते बरं का. आपण वेळेवर जावं तर तिथे कार्यक्रमाची तयारी सुरू असते. वेळ लिहिणारे वेळ विसरलेले असतात. मग सावकाशपणे कार्यक्रम सुरू होतो.. आधी तासभर येऊन बसलेले लोक खरच कंटाळून गेलेले असतात.
लग्नात याहून जास्त सावळा गोंधळ असतो. सकाळीच अक्षतसमारंभ उरकलेला असतो, मग नवरा नवरी फुलांच्या पायघड्यांवरुन महागडी पादत्राणे घालून त्या फुलांना कचाकचा तुडवत विवाह वेदीकडे जातात..
तुम्ही चप्पल, बूट घालून चालणार आहात मग कशाला तो फुलांच्या खर्चाचा अपव्यय.? असो विषयांतर झाले. आपण बोलत होतो वेळ. अक्षताची दिलेल्या वेळेपेक्षा निदान तासाभराने अक्षदा पडतात.. आणि वेळेत गेलेल्या माणसांचा जीव भांड्यात पडतो.
खरंतर लग्न हीसुद्धा आता वैयक्तिक गोष्ट व्हायला हवी. ठराविक नातेवाईक, साधेपणा, शांतपणे सर्व मंगल विधी तुम्हाला हवे असतील तर.. यात जे समाधान मिळेल ते अमुल्य असेल. हल्ली लोकांचे आयुष्य वेगवान झाले आहे.
जिव्हाळ्याचे लोक तुमच्यासाठी वेळ काढतात. त्यांचा तरी तुम्ही मान ठेवायला हवा. यावरून एक महाभारतातील गोष्ट आठवली, युधिष्ठिर राजा झाल्यानंतर राज्यकारभार अत्यंत सचोटीने आणि प्रामाणिकपणे करत होता.
त्यादिवशी कुठल्यातरी गहन समस्येवर मंत्र्यासोबत चर्चा चालली होती.. प्रदीर्घ चर्चेनंतर युधिष्ठिर थकला होता. तेवढ्यात त्याला दासाने सांगितले, एक गरीब ब्राह्मण आपली समस्या घेऊन आला आहे.
युधिष्ठराने त्याला नम्रपणे सांगितले की मी आपल्याला उद्या सकाळी भेटतो. त्यावर ब्राह्मण दु:खी झाला.. परत जाताना त्याला भीम भेटतो, त्या दु:खी ब्राह्मणाच्या गाई काही दुष्टांनी पळवून नेलेल्या असतात. महाराज उद्या भेटणार म्हणाल्यावर भीम युधिष्ठिरावर नाराज होतो.
एका सैनिकाला बोलावून सांगतो, लढाईत विजय मिळाल्यानंतर वाजवायची दुंदुभी वाजवायला सुरू करा. दुंदुभी ऐकून युधिष्ठिर आपल्या विश्रामकक्षातून बाहेर येतो आणि म्हणतो, "अरे मी आज कसला विजय मिळवला आहे म्हणून दुंदुभी वाजत आहे?"
भीम समोर येतो, "महाराज आपण या ब्राह्मणाला 'उद्या भेटायला ये' म्हणून सांगितलं, म्हणजे आपण काळावर विजय मिळवलेला आहे. नाहीतर आपण या ब्राह्मणाला उद्या भेटण्यासाठी बोलावलंच नसते.
हा विचार करून मी आपण काळावर मिळवलेल्या विजयासाठी नगारे वाजवण्याची आज्ञा दिली. या बोलण्याने युधिष्ठिराचे डोळे उघडतात. त्याला आपल्या चुकीची जाणीव होते आणि ताबडतोब ब्राह्मणाला मदत मिळते.
तात्पर्य मी सांगणार नाहीच. तेवढे सुज्ञ तुम्ही आहातच. वेळ पाळून दुसऱ्यांच्या वेळेचा अपव्यय टाळूया.. एक नवा भारतीय समाज घडवूया..! कुचेष्टेने आम्ही 'इंडियन टाईम' असे बोलतो तेव्हा आख्ख्या देशाची मानहानी करत असतो हे मात्र नक्की..!
- स्वप्नजादेवी घाटगे (कोल्हापूर)