अहिल्यानगर – मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दोन हद्दपार गुन्हेगारांना अटक केली आहे.
हे दोघेही सराईत गुन्हेगार असून हद्दपार आदेशाचा भंग करून अहिल्यानगर शहरात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत होते. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मोहरम सण शांततेत पार पडावा म्हणून स्थानिक गुन्हे शाखेला पेट्रोलिंग व तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
यानुसार पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप पवार, शिवाजी ढाकणे, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ, रणजीत जाधव व बाळासाहेब खेडकर यांनी पेट्रोलिंग दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेतला.
दिनांक ५ जुलै २०२५ रोजी अहिल्यानगर शहरातून दोन सराईत गुन्हेगारांना हद्दपार आदेशाचा भंग करताना अटक करण्यात आली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
असद गफ्फार शेख (वय ३५, रा. दर्गादायरा रोड, मुकुंदनगर) आणि सलमान मेहबुब खान (वय ३१, रा. कोठला, घासगल्ली) अशी पकडलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या घटनेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींच्या मुसक्या आवळण्यात पोलीस प्रशासन यशस्वी ठरले असून, मोहरम काळात कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही मोठी कामगिरी मानली जात आहे.