अहिल्यानगर - जिल्ह्यात ऊस वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरणे, रस्त्याच्या मधोमध वाहने चालवणे आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणे आता महागात पडणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कायदेशीर कारवाईचे आदेश आरटीओ (RTO) आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत. नुकतीच या संदर्भात एक बैठक पार पडली, त्यात त्यांनी हे आदेश दिले आहेत.
अतिभार (Overloading) : ग्रामीण रस्त्यांची क्षमता १२-१५ टन असताना ५० टनांपर्यंत वाहतूक करणाऱ्यांवर नजर ठेवली जाईल. ट्रॅक्टरमधील मोठ्या आवाजातील म्युझिक सिस्टिममुळे हॉर्न ऐकू न आल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
दुचाकीस्वारांची सुरक्षा : ट्रॉलीच्या बाहेर आलेली उसाची कांडके आणि रस्त्यावर पडलेला ऊस यामुळे दुचाकीस्वारांचे होणारे अपघात गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.
रस्त्यावर सुरक्षितता पाळा आणि धोकादायक वाहतूक निदर्शनास आल्यास प्रशासनाला सहकार्य करा. मानवी जीव महत्त्वाचे आहे, नियमांचे पालन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी केले आहे.

