आज १४ मे. आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. जन्म १४ मे १६५७ किल्ले पुरंदर येथे महाराणी सईबाई यांच्या पोटी झाला. संभाजीराजे अगदी लहान असतानाच आई सईबाईंचे निधन झाले.
पुण्याजवळील कापूरहोळ गावची 'धाराऊ' नावाची महिला त्यांची दूध आई बनली. जिजाऊंनी त्यांचा सांभाळ केला.प्राथमिक शिक्षण दिले. लहानपणापासूनच संभाजी महाराज अतिशय हुशार आणि चाणाक्ष बुद्धीचे होते.
काही ऐतिहासिक दस्तावेजानुसार ते अतिशय रुबाबदार आणि देखणे होते. सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. पण शरीर सोन्याचे अन् कान पितळेचे या म्हणीप्रमाणे काही स्वार्थी कारभाऱ्यांच्या सल्ल्याने त्या सत्तेसाठी संभाजी महाराजांना प्रतिस्पर्धी समजू लागल्या.
राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीवेळी सोबत नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षांचे होते.
शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे असल्याने शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले.
मुघल सैन्याचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.
जिजाबाईंचे निधन झाल्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते. सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले.
संभाजीराजांचा अण्णाजी दत्तोंच्या भ्रष्ट कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अनेकदा अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य करणे कठीण होते.
सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागल्यामुळे शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर त्यांना जाता आले नाही. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला.
त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. सोयराबाई आणि दरबारातील मानकर्यां नी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत, असा प्रचार सुरू केला.
सोयराबाईंची अपेक्षा होती की, शिवाजी महाराज राज्याचे वारस म्हणून राजारामांचे नाव जाहीर करतील. १६ जानेवारी १६८१ मध्ये संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतःकरणाने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना माफ केले आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले.
मात्र, काही काळानंतर अण्णाजी दत्तो आणि सोयराबाईंनी पुन्हा संभाजी राजांविरुद्ध कट केला, विषप्रयोग फसल्यानंतर आणि त्यांना कैद करून राजारामांचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. तेव्हा संभाजीराजांनी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हत्तीच्या पायी दिले.
औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा.
संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्या्चा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की, त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
'शंश्री शंभो: शिवजातस्य
मुद्राद्यौरिव राजते |
यदं कसेविनी लेखा
वतर्ते कस्यनोपरि ||'
अशी स्वतःची राजमुद्रा छत्रपती संभाजी महाराजांनी तयार केली होती. छत्रपती संभाजी महाराज दिसायला राजबिंडे होते. त्यांच्या हजरजबाबी आणि रोखठोक बोलण्यामुळेच त्यांना स्वराज्यातही बरेच शत्रू निर्माण झाले होते.
राजकारणात मुरब्बी असलेल्या संभाजी महाराजांची कीर्ती केवळ छत्रपती म्हणून नव्हती. अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकारही होते. छत्रपती संभाजी महाराज हळवे होते. मृदू मनाचे कवीही होते.
संभाजी महाराजांनी वयाच्या १४ वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. या ग्रंथात देवता, राजकारण, राजाची वैशिष्ट्ये असे संस्कृत मध्ये अत्यंत सुंदर श्लोक आहेत. याशिवाय नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या ग्रथांची निर्मिती केली.
हे ग्रंथ पाहून गागाभट्ट अतिशय प्रभावित झाले, त्यांनी स्वतः लिहिलेला 'समनयन' हा ग्रंथ अठरा वर्षांच्या संभाजी महाराजांना अर्पण केला आहे. एवढेच नव्हे तर संभाजी महाराजांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा चालवताना दिसतात.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी, मोरया गोसावी, समर्थ रामदास, सदानंद गोसावी यांना शिवाजी महाराजांनंतरही सर्वतोपरी मदत केली. १६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणातील संगमेश्वर येथे बोलावले.
ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचे काही सेवक गद्दार झाले, आणि मुकर्रबखानाला संभाजी महाराजांचा ठावठिकाणा दिला. औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला.
या कारवाईसाठी त्या ब्रम्हवृंदांनी कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत.
परिणामी शत्रूने संभाजीराजांना जिवंत पकडले. संभाजीराजे आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजीराजांना सर्व किल्ले , संपत्ती त्याच्या स्वाधीन करून मांडलिकत्व घेतल्यास जीवदान देण्याचे मान्य केले.
पण संभाजीराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. तरीही संभाजीराजांनी शरणागती पत्करण्यास नकार दिला.
या धाकल्या छत्रपतींचा मृत्यू म्हणजे महाराष्ट्राच्या काळजावरील अजूनही भळभळती जखम आहे. ती कधीच भरून निघणार नाही. पराक्रमी, स्वराज्य संरक्षक आदरणीय संभाजी महाराजांना त्रिवार वंदन.
- स्वप्नजादेवी घाटगे (कोल्हापूर)