नाशिक : शहरातील पाथर्डी फाटा, मुंबई-आग्रा महामार्गावरील एक वेगाने विकसित होणारी निवासी वस्ती, गेल्या अनेक वर्षांपासून नागरी समस्यांमुळे त्रस्त आहे. रस्त्यांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या समस्यांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाशिक महानगरपालिकेविरुद्ध (NMC) प्रचंड असंतोष वाढत आहे.
तक्रारी आणि आश्वासने.. पुढे काय ? 2021 मध्ये, तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी NMC वॉर्ड क्रमांक 31 ला भेट दिली होती, जिथे प्रशांतनगर आणि बाल मुकुंद नगर येथील रहिवाशांनी त्यांच्या तक्रारी मांडल्या त्यांनी सांगितले की, गेल्या 15-20 वर्षांपासून रस्त्यांचा विकास झालेला नाही, कारण रस्ते आणि मोकळ्या जागा NMC कडे हस्तांतरित झाल्या नाहीत. याशिवाय, कमी दाबाने पाणीपुरवठा, जुने वीज खांब बदलण्याची गरज आणि काही भागात वीज फिटिंग्जचा अभाव यासारख्या समस्या उपस्थित केल्या गेल्या. रहिवाशांनी पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव दरम्यानच्या रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे स्पीड ब्रेकर लावण्याची मागणीही केली होती. महापौरांनी बांधकाम, वीज आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन महिन्यांत या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच गेल्यावर्षी 2024 मध्ये सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच महानगरपालिकेच्या सत्तेतील भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यानीही हंडा मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र अद्याप देखील या भागात विविध भागात पाण्याची समस्या जैसेथे आहे.
2025 मध्ये, NMC ने शहरभरात 2,644 नागरी तक्रारी नोंदवल्या, त्यापैकी 1,268 अतिक्रमणाशी संबंधित असल्याचे वृत्त लोकमत टाईम्स ने दिलेले आहे. पाथर्डी फाटा येथील रहिवाशांनी रस्त्यांची दुरवस्था, अनियमित पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्यांबाबत तक्रारी केल्या आहेत. मे 2025 मध्ये, पावसामुळे नाशिकमधील रस्त्यांची स्थिती आणखी खराब झाली, आणि NMC ने दुरुस्तीसाठी 90 कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाने वृताद्वारे दिलेली आहे. पाथर्डी फाटा येथील रस्त्यांचा समावेश यात आहे, परंतु प्रत्यक्ष काम सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. 2022 मध्ये, पाथर्डी फाटा जंक्शनवर वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे ट्रॅफिक सिग्नल बसवण्याची मागणी पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) केली होती. सिग्नल बसला मात्र सकाळ - संध्याकाळ होणारी वाहतूक कोंडी काही थांबायला तयार नाही. या चौकात पोलिस फक्त नावालाच दिसतात वाहतूक नियंत्रित करण्यात मात्र ते सपशेल फेल झाल्याचे दिसते.
नागरिक, संघटना आणि पक्षीय नेत्यांची नाराजी : स्थानिक रहिवासी आणि विविध संघटना आणि पक्षीय नेत्यांनी नाशिक महानगर पालिकेच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्याच्या आगमनाने रस्त्यांची दुरवस्था आणि पाणी साचण्याच्या समस्येत मोठी वाढ होऊन परिस्थिती आणखीनच बिकट बनलिय. रहिवाशांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, परंतु मागील आश्वासनांचा इतिहास पाहता याबाबत त्यांचा संशय कायम आहे.