शेवगाव (अहिल्यानगर) – शहरात सुरू असलेल्या महाराष्ट्र सुवर्णजयंती पाणीपुरवठा योजनेच्या अनियोजित व वारंवार सुरू होणाऱ्या खोदकामांमुळे शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा गंभीर आरोप करत शिवसेना व रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
शिवसेना तालुका प्रमुख आशुतोष डहाळे व रिपब्लिकन पार्टीचे सतीश मगर यांच्यासह कार्यकर्ते उपोषणास बसले होते. यावेळी त्यांनी प्रशासनाला लेखी निवेदन देत, प्रथम पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करूनच इतर योजनेची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी केली.
योजनेतील काम झालेले असतानाही त्याच भागात पुन्हा खोदकाम सुरू केल्याने, नगर परिषदेकडून नियोजनाचा अभाव स्पष्ट होत असून, यामुळे नागरिक व व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे.
अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा वारंवार सुरू असलेल्या कामांमुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जर प्रशासनाने याची दखल घेऊन कार्यवाही केली नाही, तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही डहाळे यांनी यावेळी दिला.
नगर परिषदेच्या कामकाजातील नियोजनशून्यता आणि शासकीय निधीच्या अपव्ययावर जोरदार टीका करण्यात आली आहे. शासकीय योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता असावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.