महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले. अन् लगबग सुरू झाली.. संभाव्य उमेदवारांची प्रभागाची उत्सुकता वाढली. कोणी म्हणतं, "कमीत कमी पन्नास लाख तर हवेच.."
तर कोणी म्हणतं, कितीही खर्च होऊ दे.. यावेळेस गुलाल आपलाच.! खरेतर नगरकर मतदारांना यात काहीही रस नाही... खरं आहे, त्यांची जिंदगी जशी चालू... तशी चालू आहे.
लोकांची स्वप्नं केव्हाच विरून गेलीय.. कोण नगरसेवक आणि कोण ठेकेदार की दोघं एकच.? हेच कळेनासे झालेय, नगरसेवक फटफटीवर यायचा तोच आता इंपोर्टेड कारमधे यायला लागला, फरक काय तो एवढाच.!
ज्याला या पदाचं महत्त्वच कळलेल नाही. जबाबदारीच भान नाही. या पदाचा अर्थ ज्याला समजलाच नाही, तो काय समजू शकणार सामान्यांच दुःखं, अन् काय करणार आपल्या प्रभागाचा विकास.?
लायकी नसलेली माणसे जेंव्हा अशा पदावर येतात, तेव्हा हे शहर, प्रभाग याचं काय होणार.? फक्त आडमाप पैसा कमवायचा, हेच यांच्या जीवनाची व्याख्या असते, मग तो कोणत्याही मार्गाने.
तरीही, याच्या पलीकडे जाऊन शहरासाठी काम करणारी बोटावर मोजण्यासारखी नगरसेवक आहेत. अभ्यास, दूरदृष्टी, आत्मियता काहीही राहिली नाही. आमचीही काही स्वप्नच नाही, तर हे लोक तरी कशाला ती पूर्ण करणार.?
निवडणुकीच्या दिवशी पाच, सहा हिरव्या नोटा खिशात कोंबल्या की आलो निवडून. हेचं खरे असलं तर मग तुम्ही कसले मतदार आणि कोणतं दान.? खरेतर हे बेशरम सारखे पैसे घेणारे मतदारच शहराचे गद्दार आहेत.
इथे पैसे वाटले की सगळं जमून जातं. पिचलेल्या, सहनशील मनस्थितीत असलेले आम्ही, बँडबाजा सुरू झाला की नाचायला सुरू होतो... व्यवस्था पोखरली गेलीय. दुसरं काय.?
- जयंत येलुलकर (अहिल्यानगर)